आपल्याला अनेक जन्मानंतर हा मनुष्य जन्म मिळालेला असतो. त्यावर अनेक जन्मांची दोषाची आवरणे असतात. पुष्कळवेळेला मनुष्याला काहीही कारण नसताना अस्वस्थ वाटते, उदासीन वाटते. त्यावेळेला हे दोष उफाळून आलेले असतात. ते गुरूंच्या सेवेत गेल्याशिवाय कमी होत नाहीत.
आपले दोष बाहेर कसे काढावे हे विज्ञान सांगु शकत नाही. फक्त आध्यात्म शास्त्राकडे याचे उत्तर आहे . त्यासाठी संपूर्ण आध्यात्म जाणणारे पुरुषच मार्गदर्शन करण्यासाठी पाहिजेत.
मानवी जीवन जगण्यासाठी पात्रता वाढवायला पाहिजे. स्वतःचे दोष कमी करायला पाहिजेत. पुष्कळ माणसे आध्यात्माच्या मोठ्या गप्पा मारतात व चर्चाही करतात. परंतु त्यांच्यात कोणतेही गुण नसतात ते नुसते कोरडे पाषाण असतात. अश्या लोकांचा आपल्याला जीवनात उपयोग होत नाही. स्वतःचे दोष लक्षात येण्यासाठी व ते कमी करण्यासाठी आपल्याला जीवनात गुरूंचीच आवश्यकता असते.
कित्येक माणसांची कल्पना अशी असते कि पैसा आला ,म्हणजे तो मनुष्य सुखी असतो कारण ऐहिक सुख देणारी कोणतीही वस्तु तो विकत घेऊ शकतो. परंतु हे सुख कायम मिळत नाही. कित्येक पैसेवाल्यांना रात्री झोप येत नाही. जीवनात मनुष्याकडे पैसे येईल व जाईलही परंतु जीवनाची सार्थकता कशात आहे हे कळायला पाहिजे.
आपण मानव म्हणून स्वतःला अतिशय शुद्र समजावे. आपण कोणी विशेष आहोत असे समजता काम नये. आपल्याला चांगले बोलता आले पाहिजे, चांगले आचरता आले पाहिजे व चांगले विचार ऐकून तसे मांडता आले पाहिजेत. कित्येक लोक अभ्यास करून भाषण करतात; परंतु त्याने ऐकणाऱ्यांमध्ये रुची उत्पन्न होत नाही. कारण त्यात गोडवा नसतो; ओलावा नसतो; फक्त पाठांतर असते. पुष्कळ ठिकाणी कथा, कीर्तन करणारे असतात. परंतु त्यान्ना काहीही साध्य झालेले नसते.
कित्येक लोक साधना करतात, उपासना करतात. परंतु आपण योग्य मार्गाने जात आहोत काय? याचा पडताळा कसा घ्यावा? हे त्यांना माहित नसते. जर आपले मार्ग योग्य असेल तर आपले कर्म हळुहळु निवृत्तीकडे जायला पाहिजे. असलेल्या जंजाळातून कोणालाही न दुखवता अलगदपणे मुक्त कसे व्हावे याचा विचार केला पाहिजे. सामान्य माणसांना हे सहजासहजी जमत नाही. यासाठी त्यांना सत्पुरुषांच्या सहवासातच जावे लागते.
संगत कोणाची धरावी ? कोणाला किती जवळ करावे ? कोणाला किती जीव लावावा? हे समजायला पाहिजे. काही लोकांशी संबंध ठेवला तरी त्रास होतो व संबंध तोडला तरी त्रास होतो; अशा माणसांशी कसे वागावे या व इतर चांगल्या गोष्टी गुरु सहवासातच शिकायला मिळतात.