जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कोणताही निश्चय पक्का केला पाहिजे. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व गोष्टी नीट समजल्या पाहिजेत अन्यथा जीवनात काहीही साध्य होणार नाही. जीवनात कोणते तरी चांगले उच्च परंतु आवाक्यात असणारे उद्दिष्ट ठरवावे व त्याकडे वाटचाल करीत राहावी. जीवनात कधीही कंटाळा किंवा उबग येऊ देऊ नये. जीवनात संकटे येणार व कटू प्रसंगही येणार त्यामुळे कधीही निराश होऊ नये.
जे काय करायचे ते अंतर्मनाला साक्षी ठेवून केल्याने फसगत होण्याची शक्यता नसते. चमत्कारावर विश्वास न ठेवता सत्य काय आहे ते शोधावे. नेहमी सत्याची कास धरावी. अंगात विवेक येणे, अहंकार कमी होणे, जीवनात जगायचे कसे हे समजणे हे महत्त्वाचे आहे. शेवटी सत्याचाच विजय होतो. यादेहाला मुक्ती देखील सत्यातून मिळते. सत्य कितीही परखड असले तरी त्याला मान द्यावा व तेच स्वीकारावे. कोणाचाही द्वेष, मत्सर करूच नये. कर्तव्य करणे कधीही टाकू नये. ते करीत असताना त्यात पाप-पुण्य हे पाहू नये. वृद्धांना घरात काहीच स्थान न राहिल्याने त्यांची अडगळ होत असते. परंतु वृद्ध आई-वडिलांना सांभाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. लहान मुलांना शिस्त लावण्यासाठी पालकांनी धाक ठेवलाच पाहिजे. लहान मुलांना ओरडू नये पण वातावरण मुक्त ठेवावे.
स्वतःच्या गरजा जितक्या कमी तेवढा जीवनात आनंद जास्त येईल. घरात समंजसपणा ठेवावा. घरात जितकी शांतता व समाधान लाभेल तितके दैव अनुकूल होत जाते. घरात धार्मिक वातावरण असावे. गुरूंचा सहवास व आशीर्वाद घ्यावा. म्हणजे मन नेहमी शांत राहते मग दैव अनुकूल व्हायला वेळ लागत नाही. उग्र अन्न खाण्याचे नेहमी टाळावे. सात्विकतेची भावना असेल तरच दुःखावर ताबा ठेवता येतो. त्यातूनच उत्तम मन व बुद्धी तयार होते. मनाच्या ठिकाणी असलेली शक्तीच योग्य निर्णय घेऊ शकते व ती व्यक्ती जीवनात यशस्वी होते.
प्रथम अध्यात्माची कास धरावी व मगच विज्ञानाची कास धरावी. जीवनात कुणाला तरी शरण जाण्यासाठी मनुष्याने काही स्थाने ठेवली पाहिजेत.
जगात पुष्कळ प्रकारचे लोक राहतात आपल्या विचारांना युक्त असा आस्तिक भेटला नाही तर त्याच्याशी संबंध ठेवू नये. आपल्या श्रद्धेला तडा जाऊ देऊ नये. भगवंताची सेवा, पूजा, अर्चा अभिषेक करणे आपले कर्तव्यच आहे. नित्य साधना करणे प्रत्येकाला आवश्यक आहे. जीवन, प्रपंच सुखी होण्याची ती गुरुकिल्ली आहे.
।। श्री गुरुदेव दत्त ।।