हल्ली प्रत्येकाला आपले स्वतंत्र घर असावे असे वाटते परंतु नवीन जागी घर बांधताना जागेत पूर्वी स्मशानभूमी होती का? किती वर्षे पडीक असल्यामुळे ही जागा बांधली गेली नाही? त्या जागेत वंशवृद्धी झाली आहे का? ही सर्व माहिती काढणे आवश्यक आहे. केवळ कमी पैशात जागा मिळते आहे किंवा आपल्या जवळ चार पैसे आहेत म्हणून मिळेल ती कशीही जागा विकत घेऊन घर बांधणे योग्य नाही.
घर बांधण्यापूर्वी भूमिपूजन करावी लागते. त्यावेळी ठेकेदार किंवा जो कोणी घर बांधणार असेल त्याला गंध लावून, पेढे देऊन अधिकृतरित्या घर बांधण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकावी. हे फार महत्त्वाचे कार्य आहे. भूमिपूजन केल्यावर वास्तुपुरुषाची निर्मिती करून तो जमिनीत कमीत कमी एक फूट खोल पुरावा लागतो. वास्तु पुरुषाने संतुष्ट राहणे महत्त्वाचे आहे व त्याने 'अस्तु अस्तु' म्हणावे म्हणजे घराची भरभराट होते. त्याने 'तथास्तु' म्हणू नये. घराच्या ज्या कोपऱ्यात कधीही बदल होणार नाही अशाच ठिकाणी वास्तु देवतेची स्थापना करावी.
घराचे मुख्य द्वार दक्षिणेकडे असू नये; कारण मृत्यू हा दक्षिणेकडून येत असतो. पूर्वी घरात आग्नेय दिशेला स्वयंपाक घर, पूर्व दिशेला देवघर, ईशान्य दिशेला पाण्याची व्यवस्था तर वायव्य दिशेला खिडक्या ठेवण्याची पद्धत होती. वाड्याच्या आतच लहान विहीर किंवा आड पाण्यासाठी बांधलेले असत.
वातावरण शुद्ध करण्यासाठी हवन करणे व त्यावेळी वैदिक ब्राह्मणांकडून वेद उच्चार करणे महत्त्वाचे असते. वास्तु पूजेच्या वेळी वास्तू आपण निर्माण करावा लागतो. वास्तुपूजनाच्या वेळी मित्रमंडळी, शेजारी, नातेवाईक यांना बोलावून आपल्या आनंदात सहभागी करून घ्यावे. तसेच संत किंवा श्रेष्ठ पुरुषांचे आशीर्वाद घेणे महत्त्वाचे असते. चार लोक आपल्या घरी येणे हे उत्कर्षाचे प्रतीक असते. कोण कोणत्या वेळी काय देऊन जाईल हे सांगता येत नाही.
वास्तुशांती व सत्यनारायण पूजा यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. या दोन पूजा कधीही एकत्र करू नये. सत्यनारायण ही खाजगी बाब आहे तर वास्तुशांती ही आवश्यक बाब आहे. वास्तुशांती करता बोलाविलेल्या लोकांना पोटभर जेव घालावे. अल्पोपहार देऊ नये. पोटभर जेवू घालून संतोष करून पाठवण्याची पद्धत आहे. आपण ज्या उच्च परंपरेतून आलो आहोत व जगत आहोत त्याचा संपूर्ण अंगीकार केला पाहिजे. घरी आलेल्यांना पोटभर जेवू घालणे हा खरा यज्ञकर्म होय.
।। श्री गुरुदेव दत्त ।।