रोज काहीतरी उपासना करीत जा. अजिबात वेळ होत नाही, कामामुळे जमत नाही, सवड होत नाही. या सबबी जोपर्यंत तुम्ही बाजूला ठेवत नाही तोपर्यंत प्रगती पण त्याच पद्धतीची होत राहील.
पूर्वसंस्कार धुण्यासाठी कमीत कमी बारा वर्षे उपासना करावी लागते. उपासना करताना लोक आचरण सांभाळत नाहीत. घाईगर्दीत कशी तरी उपासना करतात त्यामुळे शक्ती उत्पन्न होत नाही. श्रम व वेळ दोन्ही वाया जातात. कोणतेही गाणे त्याच्या नेमलेल्या सुरात व स्वरात गायले तरच ते योग्य कंपने निर्माण करते. नाहीतर कानाला कर्कश आवाज ऐकायला येतो. उपासना करताना दासानुदासाची भावना आली तर या उपासनेचा आपल्याला फायदा होतो. मन निर्गुण अवस्थेत आले की सगुणाच्या रूपात माणूस जातो व इतरांनाही मार्गदर्शन करू शकतो. मनुष्य शून्य अवस्थेत गेल्यावर 'सगुणरूप' होऊ शकतो. बी मातीत पेरल्यावरच वर उगवते. नुसतेच वर येत नाही.
उपासनेचे उत्तम परिणाम होतात. आपल्या ठिकाणी असलेली कुबुद्धी नाहीशी होते, अविचार नाहीसे होतात. संकटाचा बोध होतो. काहींना श्रीगुरूंकडून होतो तर काहींना उत्स्फूर्त होतो. उत्स्फूर्त बोध उत्पन्न झाला तर चांगलीच गोष्ट आहे. रोज चिंतन मनन केल्याशिवाय अन्नग्रहण करू नये. जोपर्यंत सतत शुद्ध आचरण होत नाही तोपर्यंत मनाच्या ठिकाणी तळमळ उत्पन्न होणार नाही.
उपासना करताना त्यापासून काय फायदा होणार असा विचार करू नये प्रश्न फायद्याचा नसून आत्मोन्नतीचा आहे. भक्तांची जसजशी आत्मोन्नती होत जाते तसतसा त्याचा विकासही होतो. अध्यात्म आचरणारे जे पुरुष असतात त्यांच्यामध्ये विशेष उत्क्रांती झालेली दिसत. त्यांच्या ठिकाणी आलेले ज्ञान अधिकाधिक शुद्ध व पवित्र होत असते. अशा व्यक्तींनाच त्यांचे अनुभव येतात. त्यांचे उत्क्रांती होते.
प्रत्येक भक्ताने उपासनेसाठी आपला देह झिजवला पाहिजे. म्हणजे मुखाने त्याचे नाव घेतले पाहिजे, कानाने त्याचे गुण ऐकले पाहिजेत, नेत्रांनी त्याचे रूप पाहिले पाहिजे आणि देहाने साष्टांग दंडवत घालून त्याची क्षमाही मागितली पाहिजे. ज्यावेळी क्षमा मागितली जाते त्यावेळी आशीर्वाद ही मिळतो. हा आशीर्वाद थोर पुरुषांकडून मिळवणे हेच खरे आपले कर्तव्य आहे.
उपासना चालू असताना षडरिपुंवर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. दोष कमी कमी होण्यास मदत होते. मुखाने केवळ नाम घेणे व वागण्यात बोलण्यात व आचरण्यात सुधारणा शून्य असेल तर उपासना वाया जाते.
।। श्री गुरुदेव दत्त ।।