भगवंताला जेव्हा एखादे कार्य करवून घ्यायचे असेल तेव्हा ते त्या कार्याला पूरक परिस्थिती निर्माण करतात. अंशरुपाने रूपाने एकाच वेळी अनेक ठिकाणी जन्म घेतात. रावणाचा नाश करण्यासाठी श्रीरामांचा जन्म झाला. तर श्रीरामांना सहाय्य करण्यासाठी भरत, लक्ष्मण यांचा व शत्रू घरी बिभीषणाचा जन्म झाला. पशुंच्या सहाय्याने हा नाश करावयाची योजना असल्यामुळे भक्त श्रेष्ठ हनुमंतांचा जन्म झाला. हा जन्म चैत्र पौर्णिमेला झाला. तो पवनपुत्र असल्याने त्याला मारुतीही म्हणतात.
मारुतीच्या ठिकाणी शक्ती व बुद्धीचा सुरेख संगम पहावयास सापडतो त्याचा सगुणाकार मानवासारखा नसला तरी त्याचं मुख हे शिवा सारखे आहे. म्हणजे ते निर्गुण स्वरूपाचं मुख आहे. त्याच्या अंगावर लांब व दाट लव होती व तो गौरवण होता.
मारुती हा अकरा रुद्रांपैकी एक असल्याने शास्त्रात त्याचे खूप महत्त्व आहे. ती एक संकट निराकार करणारी शक्ती सुद्धा आहे. 'ओम मर्कटेय नमः | श्रीहरी मर्कटेय नमः |' तसेच 'ॐ नमो भगवते श्रीवीर हनुमते नमः |' या जपाने वाईट शक्ती दूर पळते. हा जप मनातील भीती नाहीशी करतो. किती मोठे पिशाच असले तरी ते जागेवरच थांबते. तसेच पंचमुखी हनुमान स्तोत्र नित्य पठणाने मनुष्य निर्भय बनतो; प्रत्येक कामात विजय मिळवतो, यशस्वी होतो. तसेच या स्तोत्रपठणाने मारुतीचे दर्शन निश्चित घडते.
मारुतीला मंत्र युक्त पूजा नसली तरी चालते. पूजेच्या वेळी लोटी भर पाणी जरी त्याच्या डोक्यावर ओतले तरी ती 'पूजा' म्हणून तो स्वीकारतो. शनीच्या साडेसातीत मारुतीची उपासना करायला सांगितली आहे.
दक्षिणाभिमुख मारुतीला 'विजय मारुती' असे म्हणतात भारताच्या दक्षिणेला लंका आहे. सीतामाईला सोडविण्यासाठी त्याने दक्षिण दिशेला प्रयाण केले होते व तेथे विजया मिळवून आला होता. तेव्हापासून 'विजय मारुती' हे नाव पडले. मारुती म्हणजे दास्यभक्तीची परिसीमाच होय. मारुतीला सदैव भगवंताच्या दास्यत्वात राहावयाचे होते म्हणून तो अखेरीस स्वर्गात न जाता प्रभू रामचंद्रांसमवेत राहिला. तो असताना श्रीरामांना कोणत्याही गोष्टीची कधीही काळजी करावी लागली नाही. म्हणूनच रामरक्षेतही त्याला स्थान मिळालेले आहे. मारुती सप्त चिरंजीवांपैकी एक आहे व तो आकाशात स्थित आहे.
तपोवन साठी आपण शास्त्रोक्त पद्धतीने मारुतीची मूर्ती तयार करून घेतली आहे. मारुतीच्या एका पायाखाली दैत्य, एका हातात पर्वत, दुसऱ्या हातात गदा दाखवली आहे. शेपूट डोक्याचे वर दाखविले आहे. ते शक्तीचे प्रतीक आहे. भगवंतानेच पशुरूप धारण केल्यामुळे दोन पाय व दोन हात दाखविले आहेत. हे मूळ हरीचेच रूप आहे.
।। श्री गुरुदेव दत्त ।।