धर्मो रक्षति रक्षितः | येतो धर्म: ततो जय: ||
धर्म हा शब्द 'ध्रु' या धातूपासून निर्माण झाला आहे. 'ध्रु' म्हणजे धारण करणे. धर्म म्हणजे चांगले विचार धारण करणे व ते प्रत्यक्ष आचरणात आणणे. ज्या विचाराने आपला अभ्युदय होईल तो धर्म व ज्या विचारांनी आपला उत्कर्ष होणार नाही तो अधर्म होय.
धर्माचे रक्षण प्रत्येकाने कर्तव्य भावनेने केले पाहिजे. कर्तव्य भावना ज्या ठिकाणी जागृत होते त्याच ठिकाणी ईश्वराचा वास असतो. धर्म व समाज भिन्न असू शकत नाहीत. जो धर्माच्या आचरण करतो, धर्म व समाज श्रेष्ठ मानतो, त्याच्या घरामध्ये परमेश्वराचा वास राहतो आणि हा परमेश्वराचा वास त्याला सर्व प्रकारचे सौख्य देतो. आपण धर्माचे रक्षण केले की धर्म आपले रक्षण करतो. आपल्या धर्माची अवस्थाच अशी आहे की तो माणसाला साक्षात नारायण बनवतो आपल्याकडील या मूळ सनातन वैदिक धर्माचे व हिंदू संस्कृतीचे महत्व पाश्चिमात्यांना कळू लागले आहे; त्यामुळे ती माणसे आपल्या या पौर्वात्य संस्कृतीकडे आकृष्ट होऊ लागली आहेत. भारतातील गुरुपरंपरा ही एक श्रेष्ठ परंपरा आहे. ही परंपरा शिष्य निर्माण करते. गुरु हे शिष्यांना सर्व प्रकारचे शिक्षणा देऊन, त्यांचे उत्तम आचरण पाहून नंतरच त्यांना जवळ करतात. जो शिष्य-गुरूंचेच धार्मिक धोरण व परंपरा पुढे चालवतो तोच उत्तम शिष्य बनण्यास पात्र होतो. अनेक शिष्यांपैकी उत्तम शिष्याची निवड करून गुरु त्याला शिष्यत्वाची दीक्षा देतात. प्रसंगी शक्तिपातही करतात. कालांतराने गुरु ब्रम्हलीन झाल्यावर हा शिष्य गुरु होतो. अशा रीतीने एक ज्योत विझताना दुसरी ज्योत निर्माण होते. 'दीपासी दिप लाविजे' अशी ही परंपरा हजारो वर्षापासून अशीच अखंड चालत आलेली आहे. हिंदू धर्मातील या अशा जुन्या परंपरा नुसत्या चालू राहिल्या तरी जगाचे कल्याण होईल. आपली परंपरा आपण अभिमानाने स्वीकारली पाहिजे.
हल्ली सगळीकडे वेदांचे उच्चारण बंद होत आहे. आपल्याकडे वेद, शास्त्र, पुराण, यज्ञयाग या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सत्य आहेत, त्यात कोठेही थोतांड नाही. अंधश्रद्धा नाही.
धर्म जास्त वाढावा म्हणून धर्म ध्वज फडकवावा. धर्म ध्वज हा एकसंध त्रिकोणी आकाराचा, अनेकत्वाकडून एकत्र कडे जाणारा आहे. धर्मध्वज फडकणे म्हणजे कार्याचा आरंभ करणे. आपला धर्मध्वज हा सदैव फडकला पाहिजे. सर्व लोकांना धर्माचे ज्ञान झाले पाहिजे.
।। श्री गुरुदेव दत्त ।।