'अहम् ज्ञानमयो विज्ञान मयोसि |'
असे भगवंताने सांगितले आहे. म्हणजे ज्ञान व विज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.ती दोन्ही भगवंताचीच रूपे आहेत. अध्यात्म हे विज्ञानाच्या विरुद्ध नाही. वैज्ञानिकांना जे काही सुचते त्यांना जे शोध लागतात ते भगवंताच्याच प्रेरणेने लागत असतात. विज्ञान हे काही नवीन निर्माण करीत नाही.जे अस्तित्वात आहे ते उजेडात आणते. भगवंताशिवाय कोणालाही निर्मितीचे कार्य करता येत नाही. विज्ञानाला जर सांगितले की, तुम्ही हिमालया पर्वत तयार करा तर तो त्यांना निर्माण करता येणार नाही. याच विज्ञानाच्या मर्यादा आहेत.
मोठमोठाले वैज्ञानिक (ज्यांनी अनेक शोध लावले ते) भगवंताचे अस्तित्व मान्य करतात. ते मान्य करतात की विश्वामध्ये अशी एक शक्ती आहे की, ती विश्वाचा गाडा काटेकोरपणे चालवते. वैज्ञानिकांनी मुलतत्वे शोधण्याचा प्रयत्न केला, ते अनुपर्यंत पोहोचले परंतु त्या अणूमध्ये असणारे प्रोटॉन व न्यूट्रॉन कोणत्या प्रेरणेने गतिमान आहे हे त्यांना सांगता आले नाही. हे ज्ञानी लोक मानतात की आम्हाला न समजलेल्या गोष्टी अनेक आहेत.
धर्माचा विज्ञानाला विरोध केव्हाही नव्हता व नाही. विज्ञानाच्या शोधांमुळे माणसाचे जीवन सुखकारक होतं असेल तर त्याला अध्यात्माचा विरोध नाही. उदा. विमानामुळे प्रवास सुखकर झाला व लांबच्या अंतरावर त्वरित जाता येते मानवाला उपकारक अशा शोधांना धर्माचा विरोध नाही. परंतु अनेक लोक स्वतःला बुद्धीवादी म्हणावितात, वैज्ञानिक म्हणावतात व देवाचे अस्तित्व नाकारतात. आम्हीच सर्व करणारे, निर्माण करणारे आहोत असे समजतात. अशा वृत्तीला धर्माचा विरोध आहे. लोक धर्म व देव काही नाही अशी वृत्ती धारणा करतात त्याला धर्माचा विरोध आहे. पाश्चात्य लोकांनी अनेक शोध लावले, वैज्ञानिक प्रगती केली, परंतु त्यांनी धर्म सोडला नाही. ते चर्चमध्ये नियमित जातात.
निरीश्वरवादी अशा काही बुद्धीवादी व नास्तिक लोकांच्या वागण्यामुळे होते काय की समाजातील लोकांच्या जीवनावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. जे जास्त शिकले नाहीत जे विचार करू शकत नाहीत अशा लोकांचा देवाधर्मावरचा विश्वास उडतो. असे लोक मग कोठेही विश्वास ठेवू शकत नाहीत. कोणतेही कार्य करावयाचे असेल तर त्याला धार्मिक अधिष्ठान पाहिजे. त्यामुळे कार्य उत्कृष्ट होत असते.
।। श्री गुरुदेव दत्त ।।