सतत ईश्वरी चिंतनाने चित्तशुद्धी होऊ शकते अशा प्रयत्नानं चित्तशुद्धी होता होता मग त्या व्यक्तीला अध्यात्मिक शक्ती प्राप्त होणं, वैराग्य प्राप्त होणं हेही होऊ शकतं व त्यातूनच ती व्यक्ती हळूहळू योग्य त्या मार्गाकडे जाऊ लागते. वैराग्याचे प्राप्ती होणं म्हणजे निरीक्ष होणं असं नव्हे तर विषयातला रस जाणं, याला वैराग्याची प्राप्ती म्हणता येईल. वैराग्य हे काही भगव्या वस्त्रांवर अवलंबून नाही, किंवा बाह्योपचारांवर ते अवलंबून नाही. तर ज्या विषयांची इच्छा आपल्या शरीरात अनेक वर्षे दडून आहे ती इच्छा नाहीशी होणं, त्याचा वीट येणं, मनापासून ती गोष्ट नको वाटणं म्हणजेच मनाला वैराग्य येणं असा वैराग्याचा अर्थ आहे. वैराग्याची दुसरी बाजू ही ज्ञानाची आहे. ज्ञान हे भक्तीतूनही येऊ शकतं, तसेच नाम जपातून ही येऊ शकतं. उदा., तुकारामांना जे काही ज्ञान प्राप्त झालं होतं ते भक्तीतूनच झालं. ज्ञान प्राप्त केले तर मनाला वैराग येईल व भक्ती केली तर ज्ञान प्राप्त होईल अशी ही एकमेकांत गुंफलेली श्रुंखला आहे.
आपण सामान्य माणसे आहोत. आपण जीवन समर्पण करू शकत नाही, पण मनात समर्पणाची भावना ठेवायला हरकत नाही. प्रत्येकाने मनाला ईश्वराची आठवण करून दिली पाहिजे. ईश्वराचे चिंतन केले पाहिजे. ईश्वरचिंतनाने शरीर व मान दोन्ही शुद्ध होतात. मनाचे दोष आपोआप नाहीसे होतात. मन नि:संशय, निर्विकल्प व शांत होण्यासाठी नामस्मरण हा सर्वोत्तम उपाय आहे. भगवंताने मनाला विश्रांती मिळवण्यासाठी काहीच स्थळे निर्माण केलेली आहेत. त्या ठिकाणी क्षणभर जाऊन बसले की मनाला आपोआप विश्रांती मिळते. ही ठिकाणी म्हणजे गुरुकुल, आश्रम अथवा तीर्थक्षेत्र होत. या ठिकाणी गेल्यावर ईश्वराला नमस्कार करताना डोळे मिटवून त्याचे रूप मनात सामावून घ्यावे.
श्वसनाच्या क्रियेद्वारे देह भगवंताची आठवण ठेवतो, पण मन हे षडरिपुंच्या ताब्यात असल्याने ते ईश्वराचा विसर पाडते; कारण मनाने जर ईश्वराची आठवण ठेवली तर तुमचा उद्धार होईल. भगवंत मनाच्या भोवती असे मायेचे वलय निर्माण करतो, की मानवाला स्वतःचा उद्धार करताच येत नाही. यासाठी आपण आपल्या देहाच्या श्वासावर 'सोहम्' वर मन केंद्रित करावे. त्यामुळे षडरिपू नाहीसे होतील, चिंतनाची सवय लागेल; पुण्याचा साठा वाढेल; चित्ताला एकाग्रता येईल. आपल्या देहात हा 'सोहम्' कोण म्हणतो याचे रहस्य लक्षात येईल.
।। श्री गुरुदेव दत्त ।।