सामान्य लोकांची कल्पना असते की,फक्त पूजा-अर्चा करणे, देवळात जाऊन दर्शन घेणे हाच खरा धर्म आहे; हे चूक आहे. पूजा करताना देवांना फुले वाहने, गंध अर्पण करणे, अत्तर लावणे हे तुम्हाला मांगल्य व प्रसन्न वाटावे म्हणून तुम्ही करता. हा झाला तुमचा वैयक्तिक धर्म. भूतदया दाखवणे, इतरांना मदत करणे व अशीच वृत्ती बाळगणे, कोणाशीही नीट वागणे, चांगले बोलणे हा धर्मच आहे. परमेश्वर कृपा करताना किती फुले वाहिली , किती गंध अर्पण केले हे पाहत नाही. परंतु या साधकाने भूतदया किती दाखवली, इतरांना किती सहाय्य केले हे पाहतो. परमेश्वराचे मोजमाप हे असे असते.
धर्म म्हणजे केवळ फक्त शाश्वत मूल्ये सांभाळणे, असा अर्थ कोणीही घेऊ नये. तुम्ही जो काम धंदा किंवा नोकरी करता त्या देवांचे स्मरण करीत मन एकाग्र करून काम करीत राहिले व लोकांची सेवा करीत राहिले तरीही हा धर्मच होतो. जर शेजाऱ्यावर संकट आले तर त्याला मदत करण्यास धावून जाणे हा शेजारधर्म आहे.
लोकांना त्या त्या वर्णाप्रमाणे धर्म आचारावयास सांगितला आहे. शिक्षण क्षेत्रात जर विद्यार्थ्याने प्रश्न विचारला तर त्याचे समर्पक व व्यवस्थित उत्तर देऊन समाधान करणे हा शिक्षकांचा धर्म आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रात एखाद्याचे काही दुखत असेल तर, रोग झाला असेल तर योग्य मार्गदर्शन करणे, त्याची प्रकृती सुधारणे हा डॉक्टरांचा धर्म आहे. प्रत्येक वर्णातील लोकांनी त्यांचे काम मन लावून करणे. हे करीत असताना इतरांच्या मदतीला धावून जाणे, भूतनया दाखवणे अशा रीतीने ईश्वर सेवा करण्याची संधी प्रत्येकाला प्राप्त होत असतेच.
जसे अध्यात्मात उच्च स्थितीला जाऊन काहीतरी साध्य केलेले साधू पुरुष निर्माण होतात तसे ही इतर क्षेत्रांतही सेवा करून उच्च स्थितीला जाणारे साधुपुरुष निर्माण होतात. महात्मा गांधी, राजेंद्र प्रसाद, विनोबा भावे वगैरे साधू पुरुष होऊन गेले. सत्पुरुष रोज जी पूजाअर्चा वगैरे ईश्वर सेवा करतात त्यामागे फार उदात्त व पवित्र हेतू आहे. लोकांचे कल्याण करणे, लोकांच्या अडचणीच्या वेळी किंवा संकटात सहाय्य करता यावे म्हणून ईश्वर सेवा म्हणजे शक्ती पूजा करणे आवश्यक आहे. तो त्यांचा धर्म आहे.
।। श्री गुरुदेव दत्त ।।