जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामधून मुक्ती मिळवणे हे मानवी जीवनाचे ध्येय आहे. परंतु सर्वसामान्यांच्यासाठी गृहस्थाश्रम हे जीवन जगण्याचे उत्तम साधन आहे. ईश्वराचीच ही योजना आहे. ईश्वर प्राप्ती करावयाची असेल तर अनंत काळ तपश्चर्याच करावी लागते. परंतु तपश्चर्या करता करता वैफल्याची भावना येऊ नये म्हणून प्रपंचाची योजना आहे. हे देवांनी फार मोठे कार्य केले आहे. ईश्वर प्राप्ती हे अतिशय अवघड, अतिशय कष्टाने साध्य होणारे ध्येय आहे. या मार्गात कंटाळा, वैताग किंवा वैफल्याची भावना निर्माण होणे योग्य नाही. इंद्रिय दमन कशा पद्धतीने करावे, कशा अवस्थेतून जावे लागते याची संपूर्ण माहिती असावी म्हणून पूर्वजांनी तपश्चर्य बरोबर प्रपंच लावून दिला.
काही लोक प्रपंचाचा तितकारा करतात हे चूक आहे. आपल्या वाट्याला जे आले आहे ते भोगलेच पाहिजे. तेथून पळ काढता कामा नये. टेंबे स्वामींना देवांचा अनुग्रह झाला होता. ते देवांशी प्रत्यक्ष बोलत असत. त्यांनी देवांना विनंती केली की मला प्रपंच करायचा नाही. देवांनी उत्तर दिले की मागील जन्माच्या ऋणानुबंधाप्रमाणे तुझ्या भाग्यात प्रपंच आहे त्याप्रमाणे तुला संसार करावा लागेल ऋणानुबंध संपले की तू संन्यास घे. त्यांचा विवाह झाला व पुढे त्यांना मुलगा झाला, पितृ ऋण व सर्व ऋणानुबंधातून ते मुक्त झाले.
या अगोदर अनेक महापुरुष होऊन गेले. तुकाराम, नामदेव, एकनाथ हे सर्व अध्यात्म क्षेत्रात महान होते. या सर्वांनी प्रपंच केलेला आहे. प्रपंचात राहून देखील ईश्वर प्राप्ती होऊ शकते हे दाखवणाऱ्या या लोकांचे उदाहरण नेहमी नजरेसमोर ठेवावे. पूर्वी ऋषीमुनीनींही लग्नकार्ये केली. त्यांनाही मुले बाळे झाली होती. परंतु उपासनेने त्यांनी मनावर ताबा मिळवला होता. अत्री ऋषी व अगस्ती ऋषीनांही त्यांच्या पत्नीमुळेच देवाचे दर्शन घडले. अध्यात्माचा विचार करताना स्त्री ही अडथळा नाही उलट पूरकच आहे हे लक्षात घेऊन सर्वांना सांभाळून प्रपंच करावा म्हणजे आपोआपच परमार्थ घडत जातो.
अध्यात्मसाधना हे तुमच्या मुख्य गृहस्थाश्रमी जीवनाला उपसाधना आहे. या साधनेला तुम्ही तुच्छ लेखू नये. कोणीही संसारत्यागही करणे योग्य नाही. परमार्थ साधनेत प्रपंच असलाच पाहिजे म्हणजेच परमार्थात अनेक वर्षे कष्ट घेतल्यानंतरही वैफल्याची भावना येत नाही.
।। श्री गुरुदेव दत्त ।।