मानवाचा जन्मच विकारातून झाला असल्याने त्याचे मन विकाराकडेच धाव घेत असते. त्याच्या मनाची ओढ विकासाकडे त्यामानाने कमी असते. मनुष्य जन्माचे मुख्य कर्तव्य किंवा उद्देश हा हळूहळू मोक्षप्राप्तीकडे जाणे हा आहे याची आपल्याला मुळात जाणीवच नसते. प्रपंचातील आनंद व सुख भोगण्यासाठीच मनुष्यजन्म आहे हे सामान्य माणसाची सुरुवातीला भावना असते. या भोगातूनच जेव्हा संकटे, चिंता उत्पन्न होतात तेव्हा माणूस आपल्या जन्माचे उद्दिष्ट काय असेल याचा विचार करू लागतो. या विचाराच्या शोधात असताना त्याला सद्गुरु भेटीची तळमळ लागते, या तळमळीचे उत्कट भावात रूपांतर झाले की, सद्गुरु माऊलींची भेट होते व पुढे मानवी जीवनाला खरा अर्थ सापडतो.
भक्त झाल्यानंतर गुरूंच्या अंगी असलेले गुण कळू लागतात. त्यांच्याच कृपेने व आपल्या प्रयत्नाने गुरूंच्या अंगी असलेले गुन्हा ईश्वराचेच गुण आहेत हे लक्षात येऊ लागते. योग्य गुरूंच्या सहवासात राहुन उपासना केल्याने मनुष्याला योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायची शक्ती प्राप्त होते. कर्तुत्ववान मनुष्य सुखात हुरळून जात नाही व दुःखात खचून जात नाही. सुख दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे त्याला अनुभवास येते. सद्गुरूंच्या आशीर्वादाने मन नि:संशय व निर्भय होण्यास मदत मिळते. त्यांच्या आशीर्वादांना अत्यंत निर्मळ व शुद्ध आचारांची फार मोठी बैठक असते. त्या आशीर्वादांबरोबर ते आपल्याला शक्ती पण देतात व ही शक्ती नेहमी विधायक कार्य करण्यास प्रवृत्त करून चुकीच्या मार्गावर जाण्यापासून परावृत्त करते.
यांचा उद्धार होतो त्यांना गुरु हे देवच आहेत हे लक्षात आलेले असते. आपल्या गुरूंना शिवसमान पाहणे हे भावना जशी जुळ होत जाते तशी आपले हळूहळू मोक्षाकडे वाटचाल सुरू होते. या दृढ भावनेनेच आपले कल्याण होईल हा उत्तम भाव मनात खोलवर ठसतं जातो. यातूनच भक्ति, प्रेम, सेवा व गुरु कार्य हेच जीवनाचे उद्दिष्ट आहे हे जाण मनात रुजत जाते. गुरुस्पर्शाशिवाय ज्ञान होत नाही म्हणून स्पर्श घेताना मनात एक शुद्ध भाव असावा, अंतःकरण स्वच्छ असावे; पावित्र्य असावे, मनात विचारही चांगले असावेत; तरच गुरुकृपा शक्य होईल. त्यांची इच्छा होईल तेव्हा एका क्षणात कृपा दृष्टीक्षेपाने ते भक्तांचा उद्धार करतात. गुरूंच्या कृपेनेच आपल्या जीवनात शुद्ध आचरण करून मोक्षमार्गाकडे वाटचाल करता येते.
।। श्री गुरुदेव दत्त ।।