मानवी जीवन अशा प्रकारचे आहे की त्याला आधाराची गरज लागते. माणूस स्वतः जरी कितीही स्वयंसिद्ध असला तरी त्याला आधार लागतोच. आपल्या पाठीशी कोणतीतरी शक्ती आहे त्या शक्तीचा आपल्याला आधार आहे ती आपली काळजी वाहते ही भावना जरी व्यक्तीने केली तरी ती शक्ती लगेच काम करायला लागते तुम्हा लोकांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव आहेच.
ज्या परंपरेत आपण गुरु उपासना करीत आहोत हे सर्वात श्रेष्ठ अशी उपासना आहे मानवी जीवनाला कायम आनंद मिळवण्यासाठी गुरुचरणांची सेवा करणे अतिशय हिताचे आहे.
गुरुचरित्राच्या ४७ व्या अध्यायामध्ये दिवाळीचा प्रसंग विशेष लक्षात घेण्यासारखा आहे. श्री गुरुंनी दिवाळीला आपल्या घरी यावं अशी शिष्यांनी उत्कट इच्छा प्रकट केली 'मी प्रत्येकाच्या घरी येणं कसं शक्य आहे' असे श्री विनोदाने म्हणाले. सर्व शिष्यांना अतिशय वाईट वाटले. काही शिष्य म्हणाले की "देवा तुम्ही आला नाहीत तर आम्ही गंगाप्रवेश करू" त्यांच्या प्रेमानुसार श्री गुरुंनी सात शिष्यांना निरनिराळ्या वेळेला बोलावलं व सांगितलं की "मी तुझ्या घरी येणार आहे पण हे तू कोणाला सांगू नकोस." श्री गुरुंनी खरोखरीच सात रुपये धारण केली व ते सात शिष्यांच्या घरी गेले. अशी आनंदात दिवाळी साजरी झाली. दिवाळी झाल्यानंतर ते सात शिष्य कार्तिक पौर्णिमेसाठी गाणगापुरात आले. श्री गुरुंचे दर्शन घेताना प्रत्येक शिष्याला असं जाणवलं की मी जे वस्त्र श्री गुरुंना अर्पण केलं होतं, तेच त्यांनी नेसलेलं आहे. प्रत्येक जण एकमेकांना सांगत होता की हेच मी दिलेलं वस्त्र आहे. ही सातही वस्त्र एका वेळी एका ठिकाणी कशी आली ? तेव्हा शिष्यांना बोध झाला की, आपल्या प्रेमासाठी श्री गुरूंनी सात रुपे धारण केली व सर्वांची वस्त्रे त्यांच्याजवळ आहेत.
आपण कार्तिक पौर्णिमेला जेव्हा गाणगापुरात येतो त्यावेळी आपल्या मनात असा एक भाव असला पाहिजे की, हा देव आपला आहे आणि आपण म्हणतो तसेच तो वागतो. आपण म्हणतो तशी कृपा ही करतो; असा दृढभाव आपल्या मनात ठेवला तरी त्याची प्रचिती यायला हरकत नाही. त्यांच्या प्रत्यक्ष वास्तव्यात जरी हे चमत्कार घडत असले तरी आज अप्रत्यक्ष वास्तव्यात सुद्धा असे चमत्कार घडत आहेत. श्री गुरु दर्शनासाठी आपल्याला बोलावतात. आपण जी भक्ती भावाने त्यांची सेवा करतो त्या प्रत्यक्ष सेवेचा अनुभव आपल्याला मिळतो. आपण प्रेम केलं तर प्रेम मिळतं. जेव्हा माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तेव्हा खरं प्रेम उत्पन्न होतं. अशी प्रेमाची भावना सतत ठेवा. देव हा आपला आहे. यातून जी शक्ती निर्माण होईल ती आपल्या कल्याणसाठीच असेल
।। श्री गुरुदेव दत्त ।।