घरातील शेजारचे किंवा नातेवाईकांपैकी कोणी गेले तर वाईट वाटणे सहाजिकच आहे. माणसाला हृदय असते. रडू कोसळणे स्वाभाविक आहे. परंतु ते तेवढ्यापुरतेच असावे. कधीही अतिरेक करू नका. जर तुम्ही अति शोक केला की, त्याला पुढे गती मिळणार असते त्यात अडथळा येतो. मग तो आकार घेऊ लागतो जर त्याने आकार घेतला तर तो तुम्हाला फार हैराण करतो.
रस्त्यातून जाणारे प्रेत पाहून रडू नका. दुःखी होऊ नका. त्याच्या मृत्यूचे कारण तुम्ही तर नाहीना. मग दु:खी व्हायचे काहीच कारण नाही. दुसरे म्हणजे जो तो आपल्या गतीने येतो व जातो. आपण त्याला मुळीच कारणीभूत नसतो.
मृत माणसाचे फोटो घरात लावू नका, ते तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मदत करायला येऊ शकणार नाहीत. शिवाय त्यांच्या आठवणीने चांगला दिवस दुःखी व कष्टी करू नये. जितके आनंदात राहता येईल तेवढे राहावे. गेलेल्या व्यक्तीबद्दल अनादर दाखवू नये. फोटो उचलून फेकून देऊ नये. परंतु कपाटात ठेवून द्यावेत. काही लोक गेलेल्या व्यक्तींच्या फोटोला तिथीला हार घालतात. त्या दिवशी आठवण काढून दुःखी होतात हे चूक आहे. आमचे म्हणणे असे की, गेलेल्या व्यक्तीची पुन्हा आठवण देखील काढू नये.
आपण मनुष्य आहोत. देवांनी आपल्याला बुद्धी दिलेली आहे. व्यवस्थित व आनंदात जगता आले पाहिजे. जर जीवन जगण्याचे सूत्र तुमच्या लक्षात आले नाही व तुम्ही दुःखीच राहो लागलात तर ईश्वर त्यात काय करणार ? एक गोष्ट लक्षात घ्या की गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीने किंवा अति शोक केल्याने तीच व्यक्ती पुन्हा जन्माला येते. तुम्ही नेहमी ईश्वरा चिंतन करा. परमेश्वरच जीवात्म्याच्या रूपाने अवतरतो व शेवटी जीवात्मे परमात्म्यात विलीन होतात.
मन करा रे प्रसन्न | सर्व सिद्धींचे कारण ||
।। श्री गुरुदेव दत्त ।।