कर्म म्हणजे केलेले कृत्य. कर्म चांगले किंवा वाईट दोन्ही असते. वाईट कर्माचा दोष म्हणजे पाप बुद्धी होय. या पाप बुद्धीमुळे नेहमी वाईट विचार येतात. महाभारतातील धृतराष्ट्राचे उदाहरण सांगता येईल. राज्य मिळूनही त्याला त्याचा उपयोग झाला नाही. तो जन्मांध होता. त्याच्या अंतःकरणात पाप बुद्धी होती. याशिवाय त्याला शकुनीची जोड होती. बोलताना गोड बोलणे, तात्पुरते चांगले वागणे परंतु कृती करताना मात्र दुसऱ्याचे वाईट इच्छिणे, वाईट करणे हा कर्माचा दोष आहे. अशा दुटप्पी धोरण असलेल्या व्यक्तींना चांगले दिवस येत नाहीत. धृतराष्ट्र नेहमी म्हणे की त्याच्या भाग्यात दोष आहे. परंतु भाग्य निराळे व कर्म निराळे होय.
भाग्य म्हणजे विजय मिळणे नव्हे; तर हे अपेक्षित नाही ते मिळणे म्हणजे भाग्य होय. असे भाग्य पूर्वापार पुण्य साचल्यानेच प्राप्त होते. तुमच्या पूर्वकर्माची फळे मिळणे, कुटुंबाचे पुण्यही फळाला येणे अशी अनपेक्षितरीत्या चांगली फळे भाग्याने मिळतात. हाताखाली काम करण्यासाठी चांगली विश्वासू माणसे मिळणे हे भाग्याचे लक्षण आहे. गुरुकृपा असेल तर चांगलीच माणसे मिळतात, वाईट माणसे त्या बाजूला फिरणारही नाहीत. एकाएकी धनलाभ होणे, अपेक्षा नसताना पैसे मिळणे हे पूर्व पुण्याईचे लक्षण आहे.
आमच्यासारख्या सद्गुरुषांचे दर्शन होणे, दर्शन होऊन त्या चरणांशी स्थिर होणे हे तुमचे भाग्यच होय. तुम्ही सातत्याने केलेले देवदर्शन, वाचन, मनन, चिंतन, पारायण यामुळे थोडे थोडे पुण्य जमा झाले, त्याचा उदय झाला व म्हणून तुम्ही या चरणांजवळ येऊ शकलात.
नुसत्या शून्याला काही किंमत नसते. त्याआधी कुठेतरी आकडा पाहिजे. तसेच गुरुकृपा असल्याशिवाय भाग्य हे उदयाला येत नाही. भारतातील लोक फार भाविक आहेत. कळत नकळत ते देवाचे सतत काहीतरी करीत असतात. कोणी चिंतन मनन करतात, कोणाचा दुसऱ्यांना मदत करण्याकडे कल असतो, कोणी सतत दानधर्म व परोपकार करीत असतात. या पद्धतीने थोडा थोडा पुण्यसंचय होत असतो. असेच पुण्य साचत जाऊन त्याला कधीतरी, जीवनाच्या कोणत्यातरी फेऱ्यात त्याचे फळ मिळते.
दैन्य व मत्सर या दोघांचा एकत्र वास असणे हे पाप बुद्धीचे म्हणजे कर्माचे दोष आहेत; तर सरळ व सहज स्वभाव असणे हे भाग्याचे लक्षण आहे. हे लक्षण फार कमी लोकांमध्ये सापडते. आमच्याकडे जशी सहज व सरळ स्वभावाची माणसे येतात तशीच कर्माचे दोष असलेली माणसेही येतात. या दोघांचीही प्रगती होते पण दैन्य व मत्सर असलेल्यांचे दोष हळूहळू कमी होत जाऊन नंतर ते प्रगतीच्या मार्गावर जातील. दरम्यानच्या काळात सरळ व सहज स्वभाव असलेल्यांची पुष्कळ प्रगती झालेली असेल. दोघांच्या प्रगतीत फरक असेलच.
।। श्री गुरुदेव दत्त ।।