माणसाच्या मनाला शांतता लाभली नाही तर ऐश्वर्य असू द्या, अधिकार असू द्या, त्याचा काहीही उपयोग नाही. प्रत्येकाने आपल्याला शुद्ध कसे राहता येईल, चांगले कसे वागता येईल हे लक्षात ठेवले पाहिजे. शरीराच्या पोषणासाठी ज्याप्रमाणे अन्नाची गरज आहे, त्याप्रमाणे मनाच्या समाधानाकरिता, शांती करिता साधनेची आवश्यकता आहे. दिवसातील काहीतरी वेळ त्यासाठी देणे अत्यंत जरुरीचे आहे. मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे हे जरी सत्य असले तरी मुळात जन्म हा विकारातून झालेला असतो व त्यामुळे विकारांचा प्रभाव मनावर असणे स्वाभाविक असते. त्यामुळे मन हे विकारातून काढून विकासांकडे लावणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पूर्वकर्मानुसार अधोगती कडे जाणारे मन त्यापासून परावृत्त करून इंद्रियांपलीकडील ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी काहीतरी साधना करणे आवश्यक आहे. 'मी' पण विसरावयास पाहिजे म्हणजे कालांतराने मनाला शांतता व समाधान मिळेल.
अधोगती थांबवून ऊर्ध्वगती मिळवण्यासाठी साधना हाच एकमेव मार्ग आहे. नामस्मरण ही सर्वांना जमणारी अशी साधना आहे. पूर्व कर्मदोषांमुळे त्यात अडथळे येतात हे जरी सत्य असले तरी प्रयत्नाने त्यांना दूर करायला हवे. साधनेची एकदा मनाला सवय लागली म्हणजे त्यात नियमितपणा येतो. जेव्हा मनाची तळमळ वाढेल तेव्हा योग्य सत्पुरुषांची गाठ होते व सद्बुद्धी निर्माण होऊन मन सन्मार्गाकडे वळते. अशी व्यक्ती सत्कर्मच करीत राहते. तिची वृत्ती विधायक कार्याकडे वळते व उत्स्फूर्तपणे योग्य रीतीने कार्यरत होते. बऱ्याच वेळेला असेही घडते की काही व्यक्ती खूपच सत्कर्म केले आहे असे समजून साधना थांबवतात ते चूक आहे. त्याचप्रमाणे जनसामान्यांचा असा एक दुर्गुण आहे की, अशी सत्कर्मे करणाऱ्या माणसांना त्यापासून परावृत्त करण्याचा ते प्रयत्न करतात. परंतु त्यात किमान अडथळे आणू नये. उलट आपल्याला जर असे कार्य जमले नाही तर कार्य करणाऱ्या लोकांना सहाय्य करावे ते पण सत्कर्मच आहे.
तळमळ व चांगले कार्य करण्याची प्रवृत्ती असेल तर साधना सहज जमते. सत्कर्म करून आनंद प्राप्त झाला पाहिजे. हा आनंदाचा मार्ग आहे. मन लावून कार्य केल्यावर व सत्पुरुषांचा आशीर्वाद असल्यावर आनंदाची मनाच्या शांतीची प्राप्ती निश्चितच होते.
।। श्री गुरुदेव दत्त ।।