भक्ती वाढवायची असेल तर कर्माची आवश्यकता असते. भक्ती वाढली की कर्म वाढते कर्म वाढले ही कर्तव्य वाढते आणि कर्तव्य केल्याने जो आनंद मिळेल तो म्हणजे भक्तीचा रस आहे. भक्ती आपल्या जीवनाचा उद्धार करणारी झाली पाहिजे. गुरुकृपेने हा भक्तीचा आनंद आपल्या जीवनात वाढेलच; पण प्रयत्न मात्र आपण केले पाहिजेत. जर प्रयत्न झाला नाही तर यश त्या मानानेच असते. आपल्या जीवनामध्ये परमात्मा कृपेने, गुरु कृपेने आनंद प्राप्त झाला तरी किंवा आपल्या जीवनाची उत्क्रांत अवस्था झाली तरी कसल्याही परिस्थितीमध्ये गुरुचरणापासून दूर जायचे नाही असा निश्चय आपण केला पाहिजे. पैसा मिळाल्यावर लोक उन्मत्त होतात, आपल्या कर्तुत्वाने मिळाला अशी भावना करतात. पण या भावनेला कुठेही थारा द्यायचा नाही.
आपल्या हाताने भक्तीमध्ये कुठेही अंतर पडू नये आणि आपल्या जीवनात उत्तर उत्तर आनंद निर्माण झाला पाहिजे हे स्वतः अनुभवले पाहिजे. म्हणजे ती भक्ती अतिशय विशुद्ध आणि निर्मळ अशी राहते. दृढ, विशुद्ध भक्ती अर्जुनाची होती. अर्जुनाने ज्याप्रमाणे श्रीकृष्णाची भक्ती केली ती श्रीकृष्णाला मान्य होती. अर्जुन वरवर असे काही दाखवीत नव्हता पण अंधाकरणात मात्र श्रीकृष्णाशिवाय दुसरे विचार नव्हते; त्याचे उदाहरण असे की- एक दिवस नारादांनी भगवंताला असे विचारले की भगवंता मी अखंड तुझे नाव घेत आहे; पण मला भेट देण्याकडे तुझा विशेष कल नाही. पण तुझ्याकडून अर्जुनाचे घोडे धुणे मात्र चालले आहे? हा काय प्रकार आहे? भगवंत थोडे हसले. ते म्हणाले की ज्यांनी मला जीवन सर्वस्व अर्पण केले आहे किंवा माझ्याशिवाय दुसरे काही ज्याला स्मरतच नाही त्याची सेवा करणे मला भागच आहे. नारदांना घेऊन भगवंत, अर्जुन ज्या ठिकाणी झोपला होता तेथे गेले. पण अर्जुनाची ती झोप नसून सोहमचा जप चाललेला होता. तो प्रत्यक्ष नारादांनी ऐकला, ते म्हणाले मी फक्त जागेपणी 'नारायण नारायण' म्हणत आहे पण हा निद्रावस्थेत सुद्धा तुझी उपासना करीत आहे. नारदांनी आपली चूक कबूल केली. कोणतेही कर्म करताना अंतकरणापूर्वक भगवंताला आठवा त्याची भक्ती करा, स्मरण करा. आपण अशा प्रकारची भक्ती केली पाहिजे की भगवंतांनी त्याची दखल घेतली पाहिजे.
।। श्री गुरुदेव दत्त ।।