अहंकार हा मनुष्य स्वभावाचा फार मोठा दुर्गुण आहे. परंतु मनुष्याला अहंकाराचा फार अभिमान असतो. काही व्यक्तींना रूपाचा, काहींना शरीराचा, काहींना पैशाचा, काहींना शिक्षणाचा, सत्तेचा, शहाणपणाचा अहंकार असतो. ज्या व्यक्तीमध्ये अहंकार आहे ती व्यक्ती इतर कोणालाही मदत करीत नाही. कोणाला शरण जात नाही किंवा कोणापुढे नम्र होत नाही. तसे पाहिले तर या व्यक्तींमध्ये काहीही विशेष नसते. पण अहंकारात मनुष्य अडकतो. वास्तविक पाहता स्वतःचे दोष स्वतःला कळावेत; परंतु अहंकारामुळे आपले दोषही माणसाच्या लक्षात येत नाहीत. स्तुती करणारे जास्त भेटतात परंतु दोष दाखवणारे फार कमी असतात. दोष लक्षात येण्याकरता चांगल्या व श्रेष्ठ पुरुषांच्या सहवासात जावे लागते.
आपल्या गुणांप्रमाणे आपल्याला भावना येतात. सत्वगुण असतील तर सत्वगुणाच्या भावना येतील; राज-तम हे गुण असतील तर त्या प्रकारच्या भावना येतील. या भावना जेव्हा माणूस व्यक्त करायला लागतो, तेव्हा त्याच्या अंतःकरणात वृथा अभिमान उत्पन्न होतो. हा वृथा अभिमान आल्यास चांगल्या वर्तणुकीला बाधा येते. रावणाच्या बाबतीत पहा, तो खरे पाहता थोर दशग्रंथी ब्राह्मण होता. त्याने महा तपश्चर्या करून साक्षात, भगवान शंकराची कृपा प्राप्त केली होती. परंतु त्याला अहंकार झाल्याने व वासना आवरताना न आल्याने तो दैत्य झाला. अखेरीस भगवंताने, प्रभू रामचंद्रांच्या रूपाने येऊन त्याचा नाश केला. भस्मासुराच्या बाबतीत तसेच घडले. ज्याच्या डोक्यावर तो हात ठेवेल त्याचे भस्म होऊन जाईल असा वर त्याने भगवंताकडून मिळवला होता. पुढे त्यालाही अहंकार झाल्याने व दुर्बुद्धीमुळे साक्षात भगवंताच्याच डोक्यावर हात धरून तो त्यांनाच भस्म करावयास निघाला. भगवंताने त्यालाही, स्वतः मोहिनीच्या रूपात येऊन नृत्य करता करता स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवून स्वतःचे भस्म करायला लावले.
रामदास स्वामी स्वतः समर्थ असून हातात झोळी घेऊन भिक्षा मागत होते कारण अहंकार कमी करण्यास काहीतरी कारण असावे लागते. रामदास स्वामीं सारख्या मोठ्या माणसांना देखील अहंकार कमी करण्यासाठी इतके प्रयत्न करावे लागतात तर सामान्य माणसाची काय कथा?
सामान्य व्यक्तीमध्ये अहंकारामुळेच विनय लवकर येत नाही. सामान्य लोकांना अहंकार कमी करण्याचे अवघड आहे परंतु अशक्य नाही. प्रयत्नाने अहंकार कमी करण्यात यश येते. अहंकार कमी करण्यासाठी जर दुसऱ्याशी बोलण्याचा प्रसंग आला तर गोड बोलावे. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित द्यावीत कोणाचे मन दुखावले जाईल असे बोलू नये. जीवनामध्ये ताठपणाचा उपयोग होत नाही
।। श्री गुरुदेव दत्त ।।