आपल्या आश्रमाचे नियम व शिस्त सर्वांनी पाळली पाहिजे. आश्रमात आल्यानंतर हातपाय धुवून प्रथम देवांचे दर्शन घेऊन नंतर गुरूंचे दर्शन घ्यावे. जेथे देवांचे अथवा गुरूंचे अधिष्ठान असते तेथे स्वैर वागता कामा नये. गुरूंच्या समोर ध्यानस्थ बसण्याचे नाटक करू नये. गुरूंच्या समोर चार चांगले शब्द ऐकावयास जातो, ती जागा म्हणजे ध्यान करण्याचे साधन ठिकाण नव्हे, हे लक्षात घ्यावे. आश्रमात येताना तुमचा भाव चांगला पाहिजे व द्रुध विश्वास पाहिजे. गुरूंबद्दल आदरभाव व भावना आपल्या वागणुकीतून व्यक्त कराव्यात व वागताना काळजी घ्यावी.
गुरूंसमोर बसताना पायावर पाय चढवून बसू नये. व्यवस्थित मांडी घालून बसावे. मांडी सारखी वर करू नये. शिवाय भिंतीला टेकून बसू नये. गुरूंच्या समोर बसून काहीही खाऊ नये. गुरूंच्या समोर नेहेमी नम्र होऊन राहावे. आपली प्रतिष्ठा, मोठेपणा, पदव्या विसराव्यात.
गुरूंच्या समोर बसलेले असताना आश्रमात किंवा कोणा भक्तांच्या घरी, भक्तांनी आपापसात बोलू नये. बाष्कळ विनोद,टिंगलटवाळी करू नये. हळू किंवा जोराने हसू नये. एकाने दुसऱ्याला इशारे करू नयेत. गुरुदेवांशिवाय इतरांनी बोलू नये. आपल्याला गुरुदेवांना जे विचारायचे असेल ते थोडक्यात विचारावे; शांत बसावे व जो कोणी गुरुदेवांना जिज्ञासेने विचारत असेल त्याला गुरूंनी दिलेले निर्णायक व सुंदर शब्दातील उत्तर कां देऊन ऐकावे. जीवनात आत्मसात करावे. त्यांनी चर्चेतून केलेला अनुग्रह घरी गेल्यावर पुन्हा आठवावा, चिंतन करावे, मनन करावे म्हणजे उत्तरातील अनेक अर्थ लक्षात येतात.
गुरु जेव्हा भक्ताच्या घरी येतात तेव्हा तो क्षण भक्ताच्या आयुष्यातील अत्युच्य आनंदाचा क्षण असतो. सत्पुरुषांचे गुरूंचे पूर्ण भरलेल्या कुंभाने घरच्या गृहिनेने स्वागत करणे ही सर्वात उत्तम परंपरा आहे. काळशी मध्ये पूर्ण पणे पाणी भरावे. त्यावर अशोक किंवा आंब्याची पाने ठेऊन त्यामध्ये श्रीफळ ठेवावे. या नंतर निरांजनाने ओवाळावे. हळदी कूंकुवाची आवश्यकता नाही. पायावर दूध व नंतर पाणी घालण्याची पद्धत आहे. या पाद्यपूजेने श्रीशिवांपासून सर्व गुरूंची पूजा होते. त्याचा आशीर्वाद मिळतो. त्यांचा आशीर्वाद मोठ्या संख्येने घ्यावा. हा आशिर्वादाचं आपले कल्याण करतो. घरामध्ये सद्गुरू आल्यावर त्यांची पाद्यपूजा करावी.
।। श्री गुरुदेव दत्त ।।