मनुष्याला जगण्यासाठी जशी अन्नाची व कामाची गरज आहे त्याचप्रमाणे वैयक्तिक अभ्युदय व देशाचा उत्कर्ष होण्यासाठी धर्माची, धर्मपालनाची तितकी आवश्यकता आहे. प्रत्येक मनुष्याने तो जसा स्वतःची संपत्ती सांभाळतो तसा आपला हा मूळ धर्म सांभाळणे गरजेचे आहे. धर्मपालनाने माणसाच्या मनावर आपोआप निर्बंध येतात. त्यामुळे क्रूरता व अराजकता माजणार नाही. धर्म निरपेक्षतेपेक्षा धर्म साक्षेपता ठेऊन राज्य कारभार चालवला पाहिजे. धर्माचे केवळ 'अनुकरण' करून चालत नाही तर 'आचरण' करणे महत्वाचे असते. धर्माला साक्षी ठेऊन सर्व कार्ये केली पाहिजेत म्हणजे माणसाच्या मनावर एक प्रकारचा लगाम लागेल व तो वाईट कामे करणार नाही.
आपल्या धर्मात मूर्तिपूजा आहे. मूर्तीला पाहिल्यानंतर उच्च व पूज्य भाव निर्माण होतो. आपल्या पेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे व त्याच्या पुढे लीन व नम्र होता यावे ही त्यामागे कल्पना आहे. धर्म आचरण केल्याने आपला वैयक्तिक विकास होऊ शकेल. जर आपला विकास झाला तर पर्यायाने देशाचा विकास होणारच. दुसरे म्हणजे धर्माचे आचरण करता करता तुमचा अभुदय होतो. ही फक्त हिंदू धर्मातच पद्धत आहे व परंपरा आहे. अभुदय होणे म्हणजे तिन्ही लोकांत उत्कर्ष होणे. जेव्हा तुम्ही खऱ्या वृत्तीने धर्म आचराल तेव्हा तुमच्या जीवनात ज्या गोष्टींची गरज आहे त्या वस्तू तुम्हाला आपोआप प्राप्त होतात.
धर्म हा संस्कारासाठीच असतो. तो कधीही द्वेषाची नसतो. भावना म्हणजे धर्म नाही. धर्मपालन करताना मनाला त्रास, दडपण किंवा क्लेश नको. उलट धर्मपालन करताना आनंदच वाटलं पाहिजे. तेव्हाच धर्माचे पालन झाले असा त्याचा अर्थ आहे. तुमचे ठिकाणी स्थिर वृत्ती आली पाहिजे. अशा धर्म पालनाने तुमचेही सामर्थ्य वाढते. धर्मपालन करताना त्या कार्यात तुम्ही संपूर्ण मन ओतले पाहिजे. धर्माचरण करताना गाडीभर कर्म करण्याची गरज नाही. थोडे करा पण संपूर्ण मन लावून एकाग्र चित्ताने करा. माझे जेवण बघा मी कोठेही बाहेर जात नाही, येत नाही. कोणालाही भेटत नाही तरीही आमची सर्व कामे व्यवस्थित चाललेली असतात. इतर लोक धर्म धर्म म्हणून वेगळा अर्थ लावतात व वेगळी कल्पना करतात हे चूक आहे.
तुम्हीही व्यवस्थित धर्मपालन व आचरण करा. देव तुमचे कल्याण करील.
।। श्री गुरुदेव दत्त ।।