सामान्य माणसे वारांचे उपवास करीत बसतात हे काही योग्य नाही. केवळ वारांचे उपवास करणे याला फार महत्त्व नाही. वारांचे उपवास हे देव देवतांचे उपवास नसून ते ग्रहांचे उपवास असतात. हे पुष्कळांना माहीत नसते. हे करताना उपवास मोडला किंवा त्यात खंड पडला तर चालते; त्यामुळे विशेष फरक पडत नाही. जर वारांचे उपवास कोणी सत्पुरुषांनी किंवा गुरूंनी सांगितले असतील तर त्याची विशेष काळजी घ्यावी. कारण गुरूंनी जर करावयास सांगितले असेल तर काही विशिष्ट हेतू नजरेसमोर ठेवून व त्या भक्ताची विशेष प्रगती घडवून आणण्यासाठी सांगितलेले असते. अशावेळी खंड करू नये व शक्यतो उपवास तुटू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे.
याहीपेक्षा चांगल्या परिणामाची अपेक्षा असेल तर व्रत करावे. ज्यांच्या घराण्यात कोणाच्या कुळधर्म कुळाचार म्हणून काही व्रतांचे उपवास करणे आवश्यक असेल तर ते त्यांनी जरूर करावेत. जेव्हा गुरू किंवा सत्पुरुष विशिष्ट हेतू नजरेसमोर ठेवून भक्ताला व्रताचा संकल्प करावयास सांगतात तेव्हा त्याचे परिणाम निश्चितच चांगले होतात. त्यादिवशी उपवास करावा असे अगोदर निश्चित केले असेल त्याप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी एकाच वेळी दिवसभरात जेवण घ्यावे. दुसरे काहीही खाऊ नये. उपवास कशासाठी केला यासाठी देवांचे सतत स्मरण ठेवावे. सोमवार, प्रदोष हे व्रत आहेत. हे साधे उपवास नाहीत. उपवास केल्याने शरीर शब्द होते हे बरोबर आहे. फक्त निरोगी व्यक्तीनेच उपवास करावा. अन्यथा उपवासाचा फायदा मिळत नाही. उपवास केल्याने प्रत्यक्ष ईश्वराचा अनुभव कधीच येणार नाही. ज्या लोकांना धर्म समजलेला नाही, योग्य मार्ग सापडलेला नाही ते कडक उपासनेच्या मागे लागतात. श्रद्धा, विश्वास व परंपरा समजून लोक त्याप्रमाणे कडकपणे उपवासाचा अवलंब करतात. व्रतांचे उपवास सर्वांनी (ब्राह्मणापासून शुद्रांपर्यंत) करावेत. सोळा सोमवारचे व्रत करणारी ही खूप माणसे दिसतात. हे व्रत पती पत्नीने करावे असाही एक नियम आहे. दोघांचेही भाव उच्च असतील तरच त्या व्रताचे फळ निश्चितच मिळते.
उपवासा बरोबर इतरही नियम पाळावे लागतात. ब्रह्मचर्य पाळावे लागते. मौन पाळावे लागते. दुसरे म्हणजे स्थळ सोडू नये. जर इकडे तिकडे हिंडावयास लागले तर बाहेरचे अनेक सुगंध लक्षात येतात व निरनिराळ्या वस्तूंची चव आठवते. चव ही उपवासातील मोठा अडथळा आहे.
व्रत आचरताना शास्त्रात दिलेल्या नियमांचे पालन करावे लागते म्हणजे प्रगती झपाट्याने होते.
।। श्री गुरुदेव दत्त ।।