श्रीराम राम रघुनंदन राम राम |
श्रीराम राम भरता ग्रज राम राम ||
श्रीराम राम रणकर्कश राम राम |
श्रीराम राम शरणं भव राम राम ||
भगवंता नेहमी अव्यक्त स्वरूपात असतात. जेव्हा ते व्यक्त होतात, आकारात येतात, देह धारण करतात तेव्हा शिस्त, न्याय, प्रेम, माया दयाळूपणा हे सर्व गुण बरोबर घेऊन येतात. गरज असेल तेव्हा प्रकट ही करतात.
श्रीराम स्वतः भगवंताचा अवतार होते तरीही त्यांच्या वडिलांचा अवेळी मृत्यू का झाला ? असा प्रश्न सामान्य माणसांना पडतो. भगवंताचा जन्म कोणत्या कारणासाठी झाला याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून वरील प्रश्नाचा विचार झाला पाहिजे. श्रीरामाचे कार्य वडिलांना वाचविण्याचे नव्हते.
श्रीरामाचे कार्य रावणाला ठार मारायचे होते. तसेच ज्या ज्या लोकांची दैत्य वृत्ती होती त्यांचा नाश करावयाचा होता. रावणाला मारण्या अगोदर अनेकांच्या मार्फत त्याला सुचविले गेले, की रामाला शरण जावे; परंतु दुराग्रही व हट्टी स्वभावाच्या रावणाने ते ऐकले नाही. भगवान रामचंद्र रावणाशी छुप्या डावपेचाचे युद्ध खेळले नाहीत. रावणाला अनेक वेळा सावरण्याची संधी देऊनही त्याने ऐकले नाही म्हणून शेवटी नाईलाजास्तव त्याचा नाश केला. श्रीरामाबरोबर जे जे होते त्यांचा अभ्युदय झाला. जे देवाच्या बाजूने वागतात, बोलतात त्यांचा उद्धार होतो. श्रीरामाच्या विरुद्ध जे होते त्यांचा नाश झाला.
संसारात व व्यवहारात राहून सामान्य लोकांनी कसे वागावे याचा आदर्श रामाने निर्माण केला. सीतामाई ही एक शक्ती होती. ती अत्यंत स्वच्छ व शुद्ध होती याची त्यांना पूर्ण खात्री होती. फक्त लोकापवाद टाळण्यासाठी त्यांनी सीतेची अग्निपरीक्षा घेतली. कोणतीही वस्तू जेव्हा आकारात असते तेव्हा तिला तिच्या मर्यादेप्रमाणे वागावे लागते. त्या बाहेर जाता येत नाही. म्हणजेच सर्व मानवी सोपस्कारातून जावे लागते. कार्य पूर्ण झाले की त्या आकाराचा नाश करावा लागतो.
।। श्री गुरुदेव दत्त ।।